Saturday 2 November, 2013

समाजाची निर्मिती

गेल्या लेखात लिहिल्याप्रमाणे "तगून राहण्याची प्रेरणा" ही जवळपास आपल्या सर्वच गोष्टींच्या मुळाशी आहे.

तगून राहण्यासाठी निरनिराळे प्रयोग निसर्गात होत असतात, वेगवेगळे मार्ग अवलंबले जात असतात. मानवी समाजाच्या मुल्यांचे निकष लावून यातला अमुक मार्ग योग्य, तमुक अयोग्य असे म्हणण्यात अर्थ नाही. उलट निसर्गातील निरनिराळे प्रयोग पाहून, समजून घेऊन ही मूल्येच तपासायला हवीत. (म्हणजे लाल रंगाचा चष्मा घालून झाडं लाल आहेत असं म्हणण्यात काही अर्थ नसतो. चष्माच तपासला पाहिजे.)

तगून राहण्यासाठी निसर्गात जे प्रयोग झाले/ होतात, त्यातला एक कमालीचा यशस्वी प्रयोग "समाजाची निर्मिती" हा होय.

ज्या प्रजातींमधील जीव तगण्यासाठी सक्षम ठरू शकले नाहीत, अशा अनेक प्रजाती कालौघात नष्ट झाल्या. मात्र केव्हातरी कुठेतरी जीवांनी एकत्र येण्याची, परस्पर सहकार्याने जगण्याची युक्ती निसर्गाला सापडली. या युक्तीचा कमी-अधिक वापर करून अनेक प्रजातींना तगून राहण्याची क्षमता आणि शक्यता वाढवता आली. जीवसृष्टीतील निरनिराळ्या प्रजातींमधील समाजरचना अभ्यासली तर समाजनिर्मितीच्या प्रक्रियेचा एक ढोबळ अंदाज येतो.

मूळ अवस्था ही स्वतःच्या प्रजातीतील दुसऱ्या जीवाशी अजिबात (पुनरुत्पादनासाठीही) संबंध येत नाही अशा प्रजातींचा. यात जिवाणू, विषाणू यांच्यापासून काही वनस्पतींपर्यंतच्या प्रजाती मोडतात. या अवस्थेला आपण असामाजिक असं म्हणू शकतो.

त्यानंतर पुनरुत्पादनापुरता संबंध येतो अशा प्रजाती (उदा. डास, काही प्रकारचे मासे) आणि मग त्याशिवाय पिल्लांचे संगोपन करण्यापुरता संबंध येतो अशा प्रजाती (उदा. काही प्रकारचे पक्षी) असे टप्पे येतात. इथे समाजनिर्मितीची नुसती चाहूल लागायला सुरुवात झाली आहे, समाज म्हणावा असं अजून नाहीच. ही समाजपूर्व अवस्थाच.

समाजाची खऱ्या अर्थाने सुरुवात म्हणता येईल असा टप्पा तेव्हा येतो जेव्हा प्रजातीतील एक-एकटे जीव काही किंमत देऊन इतर जीवांशी संबध वाढवतात आणि त्याबदल्यात काही फायदा मिळवतात. उदा. एकटयाने चरत असताना हिंस्त्र प्राण्याच्या नजरेस पडलं तर मृत्यू जवळपास अटळ. समुहाने चरायला लागलं तर मात्र हल्ल्याची शक्यता कमी होते. शिवाय हल्ला झालाच तरी अनेकांपैकी एकावर होणार, त्यामुळे स्वतःचाच जीव जाण्याची शक्यता तर आणखीनच कमी होते. हा झाला फायदा (सहकार्याचा). पण याची किंमत काय? तर एकत्र चरल्याने पुरेसा चारा प्रत्येकाला मिळेलच असं नाही, त्यामुळे त्यासाठी स्वतःच्याच प्रजातीतील जीवांशी करावी लागणारी स्पर्धा.

किमतीपेक्षा फायदा अधिक असे झाल्यास सहकार्य करणारे जीव टिकतात, उत्क्रांत होत जातात आणि समाज निर्माण होऊ लागतो. सुरक्षेसाठी सहकार्य करणे, समूहातील अपरिपक्व जीवांचे संरक्षण व संगोपन सहकार्याने करणे, अन्न मिळवण्यासाठी सहकार्य करणे या टप्प्यावर आलेल्या समाजाला आपण प्राथमिक अवस्थेतील समाज म्हणू शकतो. या अवस्थेत ठराविक सदस्यांच्या समूहाने एकत्र राहणे, समूहातील इतर सदस्यांना ओळखणे या गोष्टी होताना दिसतात.

यापुढील टप्पा खुद्द डार्विनला गोंधळात टाकणारा. तो म्हणजे स्वतःचे नुक्सान अथवा हानी होत असूनही समाजाच्या फायद्यासाठी एखादी कृती करण्याचा. उदा. स्वतः जोखीम घेऊन, जीव धोक्यात घालून संकटाची सूचना समूहाला देणे, स्वतः मिळवलेले अन्न इतर जीवांसोबत वाटून घेणे. ("असे का" हा प्रश्न Theory of Evolution मध्ये "Problem of Altruism" या नावाने प्रसिद्ध आहे. Genetics मधील अलीकडच्या संशोधनामुळे या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर आता मिळालेले आहे.) वरवर पाहता तगून राहण्याच्या नैसर्गिक प्रेरणेविरुद्ध या व अशा प्रकारच्या कृती काही सामाजिक प्रजातीतील जीव करतात. या अवस्थेला आपण विकसित समाज असे म्हणू शकतो.

मानवी समाज हा अशा विकसित अवस्थेतील समाज आहे. विकसित समाजावस्थेचं आणखी उपवर्गीकरण केलं जातं, मात्र त्यात न शिरता वरील विवेचनावरून आपण इतकंच लक्षात घेऊयात की आपल्या समाजाच्या व्यवस्थेत एकटी व्यक्ती अनेक प्रसंगी स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना सहकार्य करते (उदा. कामाची विभागणी), आणि त्याशिवाय इतर अनेक प्रसंगी स्वतःचं नुक्सान करून घेऊन समाजोपयोगी कृतीही करते (तथाकथित त्याग). त्याव्यतिरिक्त असामाजिक अवस्थेतील प्रजाती करतात तसं निव्वळ स्वतःपुरतं पाहणं हे देखील करतेच (तथाकथित स्वार्थ).

गेल्या लेखात आपण पाहिलं की, व्यक्ती म्हणून, कुटुंब म्हणून आणि प्रजाती म्हणून तगून राहण्याच्या पातळ्यांमध्ये ताण निर्माण होतात. त्या ताणांचं मूळ समाजनिर्मितीच्या टप्प्यांमध्ये आणि आपल्या समाजाच्या सध्याच्या अवस्थेमध्ये सापडतं. सहकार्य विरुद्ध स्पर्धा, तसेच स्वार्थ विरुद्ध त्याग हे त्या ताणाचे पदर आहेत. 

मानवी समाजापेक्षाही पुढील टप्प्यांवर पोचलेल्या प्रजाती जीवसृष्टीत आहेत. त्यांच्या सामाजिक अवस्थेला आपण अतिप्रगत असं म्हणू. यात मधमाश्या, मुंग्या आणि इतर अनेक प्रजाती मोडतात. यांच्या समाजाची लक्षणे म्हणजे वसाहतींची स्थापना (जे मानवानेही केलं आहे), पुनरुत्पादनाचा हक्क ठराविक सदस्यांपुरता मर्यादित असणे, पुनरुत्पादन न करणारे सदस्य वसाहतीसाठी निवारा बांधणे, अन्न मिळवणे, वसाहतीचं रक्षण करणे अशा ठरवून दिलेल्या कामाला जुंपलेले असणे (कामगार जमात) आणि नवीन पिढीचं संगोपन वसाहतीच्या पातळीवर एकत्रितरित्या केलं जाणे.  

या अतिप्रगत प्रजातींचं वैशिष्ट्य म्हणजे इथे व्यक्तीला थारा जवळपास नाहीच. प्रत्येक जीवाने ठरवून दिलेलं काम तेवढं करायचं आणि वसाहतीचं हित साधायचं, असा तो मामला आहे. (सतत पुनरुत्पादन एके पुनरुत्पादन करणाऱ्या माशीला भले आपण "राणीमाशी" म्हणू, पण खरंतर ते देखील जोखडच.)

अतिप्रगत सामाजिक अवस्थेतील प्रजातींमध्ये सस्तन प्रजाती फार नाहीत, पण काही आहेतच. मानवी समाजाची वाटचाल त्याच दिशेने तर चालू नाही ना?

Monday 30 September, 2013

जगण्याची प्रेरणा

वास्तविक मला ज्या विषयावर क्रमाने लिहित जायचं आहे, ज्या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे, ती म्हणजे व्यक्ती आणि समाज यांच्यातील परस्पर संबंध, अशा संबंधांची गरज, त्याचे फायदे-तोटे व त्यातून निर्माण होत असलेले ताण.

मात्र हा शोध घेण्यापूर्वी, या विषयाकडे अधिक नेटकेपणाने पाहता येईल असा दृष्टीकोन तयार केला पाहिजे, काही मापदंड ठरवले पाहिजेत.

त्यादृष्टीने प्रस्तावना म्हणून काही निराळ्याच (भलत्याच) गोष्टींपासून सुरुवात करतो.

---

मानवाची, किंबहुना आपल्या सृष्टीतील सर्वच जीवांची, मुलभूत आदिम प्रेरणा कोणती याचा तर्कशुद्ध वस्तुनिष्ठ शोध आपण घेत गेलो, तर "तगून राहण्याची प्रेरणा" (Instinct to Survive) या उत्तराशी आपण येऊन पोचतो. जवळपास कोणतीही गोष्ट, निर्णय, कृती, वागणं, भावना, विचार अथवा प्रतिक्रिया आपण नीट तपासत गेलो, त्याच्या खोलात शिरत गेलो, तर मुळाशी हीच प्रेरणा सापडते. (आत्महत्येसारख्या काही बाबी आणखी विस्ताराने स्पष्ट केल्या पाहिजेत; आता तरी त्यात शिरत नाही; नंतर कधीतरी शोधावंसं वाटेलही, माहीत नाही.)

ही जी तगण्याची प्रेरणा आहे ती चार पातळ्यांवर प्रगट होते.

पहिली सर्वात दृश्य पातळी म्हणजे आपण "स्वतः" (Survival of the Self). जन्माला आल्यापासून आपल्याला जगायचं असतं. आपल्या बऱ्याचशा इच्छा, आकांक्षा, सुखं, दु:खं हे याच प्रेरणेचे दृष्य अविष्कार असतात, विशेषतः बालपणी व तरुणपणी. असं म्हणतात की माणसाला सर्वाधिक कोणती गोष्ट हवी असेल तर ती म्हणजे आनंद. पण ते पूर्ण सत्य नाही. आपल्याला आनंदाची अपार ओढ असते हे खरं, पण जीवनात आनंद नसला तरी जगण्याची आस (सहसा) टिकून राहते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही माणसं जगत राहतात, मूळ प्रेरणा टिकून राहते. आनंदी जगणं हवं असलं तरी, ते शक्य नसल्यास तेवढयाने माणसं जगणं नाकारत नाहीत.

दुसरी याहून थोडी खोल पातळी म्हणजे आपली "स्वतःची गुणसूत्रे" (Survival of my DNA). आपण स्वतः एक मर्यादित काळच तग धरू शकणार आहोत, त्यापुढे आपण टिकून राहू शकतो ते आपल्या गुणसुत्रांद्वारे. ही प्रेरणा आपल्याला पुनरुत्पादानाला प्रवृत्त करते. भिन्नलिंगी जोडीदार मिळणे, मुलं होणे, त्यांची प्रगती होणे, नातवंडं होणे या गोष्टी म्हणूनच अतीव आनंदाच्या, समाधानाच्या ठरतात.

तिसरी याहून खोल पातळी म्हणजे आपली "स्वतःची प्रजाती" (Survival of my Species). आपली गुणसूत्रे ही आपल्या प्रजातीतील असंख्य गुणसुत्रांपैकी एक. स्वतःची गुणसूत्रे कालौघात नष्ट झालीच तरी आपली प्रजाती शक्य तोवर टिकली पाहिजे ही प्रेरणा आणि शिवाय प्रजाती टिकली तर स्वतःच्या गुणसुत्रांचे संवर्धन होण्याची वाढीव शक्यता हा एक आनुषंगिक फायदा. यातून आपल्या माणसांसाठी, देशासाठी जीव द्यायला माणसं तयार होतात. समाजाचं भलं व्हावं, आणि एकूणच मानवजातीचं कल्याण व्हावं यासाठी झटतात.

चौथी सर्वात खोल पातळी म्हणजे आपली "जीवसृष्टी" (Survival of the Life). आपल्या प्रजातीपलीकडे जीवसृष्टीचा प्रचंड विस्तार आहे. यदाकदाचित आपली प्रजाती नष्ट झाली तरी जीवसृष्टी टिकली पाहिजे ही प्रेरणा आपल्याला भूतदयेला प्रवृत्त करते. पर्यावरणाचा, इतर प्राणीमात्रांचा विचार करायला भाग पाडते.

या चारही पातळ्या मी येथे थोडक्यात, ढोबळपणे (आणि कदाचित त्रोटकपणे) मांडल्या आहेत. विस्ताराने त्यांच्याविषयी लिहिण्याची गरज नाही; एकाच प्रेरणेच्या या चार स्वतंत्र पातळ्या आहेत इतकी जाणीव या टप्प्यावर पुरेशी आहे.

---

आता यात गंमत अशी आहे की, एकाच मूळ प्रेरणेच्या या पातळ्या असल्या तरी त्या सदैव परस्परपूरकच असतील असे नाही. कित्येकदा दोन पातळ्यांमध्ये ताण निर्माण होतात, परिस्थितीनुरूप त्यांच्यातील संबंधांचे संदर्भ बदलतात, झगडा निर्माण होतो, निवडीची गरज निर्माण होते, विवेकबुद्धीची कसोटी लागते.

त्यामुळे दोन पातळ्यांमधील संबंध समजून घेणे आणि ते संदर्भ ध्यानात ठेवून जगाकडे पाहणे, अनेकदा अर्थपूर्ण आणि निराळी दृष्टी देणारे ठरते. उदा. कुटुंबसंस्थेचा विचार करताना दुसऱ्या पातळीचे पहिल्या पातळीशी असलेले संबंध न्याहाळणे उपयोगी ठरते. अनेकदा हे संदर्भ छुपे असतात, सहज ध्यानात येणारे नसतात. पण थोडं खोल शोध घेत गेलं, तर कित्येकदा आपल्या आकलनाला वेगळी दिशा मिळू शकते.  

व्यक्ती आणि समाज यांच्यातील संबंधांची चिकित्सा करायची असं मी ठरवतो तेव्हा, पहिल्या व तिसऱ्या पातळीतील परस्परसंबंधांचा संदर्भ ध्यानात ठेवणे मला गरजेचे वाटते.

Saturday 11 May, 2013

हुरहूर


आईनस्टाईनने सापेक्षतावादाचा सिध्दांत मांडला तेव्हा त्यातून विश्व प्रसरण पावतं आहे असा निष्कर्ष निघत होता. तो निरर्थक वाटल्याने आईनस्टाईनने स्थिर विश्व गृहीत धरून त्यानुरूप बदल स्वतःच्या मांडणीत केले.

पण १९२७ मध्ये हबलने विश्व प्रसारण पावत आहे हे सिद्ध करणारे पुरावे सादर केले आणि मानवाच्या विश्वाबद्दलच्या संकल्पनेत कमालीचा बदल झाला. विश्वातील प्रत्येक गोष्ट इतर सर्व गोष्टींपासून दूर जात आहे हे उमगल्यावर महास्फोटाच्या संकल्पनेला (big bang theory) मान्यता मिळाली. 

एखादा फुगा फुगवला तर त्यावरचे सर्वच डाग जसे एकमेकांपासून दूर जातात तशा प्रकारचे हे प्रसारण आहे. मग अशा या आपल्या विश्वाची सध्याची सहज प्रेरणा दूर-दूर जाण्याचीच असेल का? अंतर वाढत जाणं म्हणजे विस्कटत जाणं असंच ना! म्हणजे समजा दोन गोष्टी स्वप्रेरणेने जवळ आल्याही, तरी त्यांच्याही तळाशी ही वैश्विक विस्कटण्याची बीजंच? जवळ येतानाही दूर जाण्याची प्रक्रिया सुरूच?

जन्माचंच घ्या. आईच्या उदरात आईशी सतत संपर्क. तृप्ती. मग जगात प्रवेश केल्यावर आईपासून दूर जाणे. कधीही भरून न येणारं अंतर. मानसशास्त्राच्या समजुतीनुसार, आईपासून दूर होताना आपल्या आत स्पर्शाची आणि कुणीतरी आपला स्वीकार करण्याची गरज (need to belong) निर्माण होते, जी कधीच सर्वार्थाने पूर्ण होत नाही. सगळा प्रवास अतृप्तीने करावयाचा. काहीही करा, काहीही मिळवा, कितीही सुखी व्हा, सोबतीला शेवटी एक अनामिक हुरहूर आहेच.

विश्वप्रसरणाची प्रक्रिया एक दिवस(!) उलटणार आहे. तेव्हापासून मग विश्व आकुंचन पावत जाईल. The Brief History of Time या भन्नाट पुस्तकात शेवटी स्टीफन हॉकिंग्सने तेव्हा कसं होईल याविषयी गमतीदार कल्पनाविस्तार केला आहे. म्हणजे आपल्याला भविष्यकाळ आठवेल आणि भूतकाळाबद्दल कुतूहल असेल? आधी मृत्यू, मग वार्धक्य, मग तारुण्य, मग बालपण आणि शेवटी जन्म, आणि त्याच्याही नंतर आईचा जन्म? पण आधी आणि नंतर यालाही काय अर्थ? सगळंच अतर्क्य.

तेव्हा कदाचित एक होईल. मूळ प्रेरणा जवळ येण्याची असेल. अंतरे मिटत जातील. प्रवास अतृप्तीतून तृप्तीकडे होईल.   

पण तोवर सोबतीला काय?

हुरहूर…